अकलूज (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज व संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने स्मृती भवन शंकरनगर येथे हृदय रोग व मधुमेह या आजाराबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले
या शिबिरासाठी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. संभाजी राऊत, मधुमेह तज्ञ डॉ. हर्षल एकतपुरे, माळशिरस तालुका बार असोशियन चे अध्यक्ष ॲड. नितीन खराडे पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, संचालक सुभाष दळवी, वसंतराव जाधव, पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, रामचंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
हृदयरोग तज्ञ डॉ. संभाजी राऊत म्हणाले, सध्या जगामध्ये दरवर्षी सुमारे २० लाख रुग्णांना हा आजार होत आहे. त्यापैकी १२ लाख रुग्ण या आजाराने मृत पावतात. तर पाच लाख रुग्ण हॉस्पिटल पर्यंतही पोहोचू शकत नाहीत. यामध्ये २५ टक्के रुग्ण चाळीस वर्षापेक्षा आतली आहेत. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण दुप्पट आहे.
त्याला कारण, बदललेली जीवनशैली, ताणतणाव, रक्तदाब,व वाढते वजन हे आहेत. यासाठी वेळीच उपचार व तपासण्या करून घेतल्या तर या आजाराला दुर ठेवता येते. यावर उपाय म्हणजे योग्य आहार घेणे, दररोज किमान चाळीस मिनिटे व्यायाम करणे, व तणावापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. व्यसन करू नये, मसालेदार खाऊ नये, आहारात फळांचा उपयोग ज्यादा करावा. नियमित व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो व आपले शरीर तंदुरुस्त राहते. यावेळी त्यांनी रुदयरोगाचे प्रकार, त्यावरील उपाय, आहाराचे महत्व हृदयविकाराच्या उपचार पद्धती स्पष्ट केल्या. हृदय विकाराचा झटका आल्यास रुग्णांना तात्काळ हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणं गरजेचं असतं त्याच्यासाठी वेळ महत्वाची असते.
मधुमेह या आजाराबाबत बोलताना डॉ. हर्षल एकतपुरे यांनी मधुमेहाची संकल्पना व त्यातील सत्य स्पष्ट केले. रुग्णांच्या बैठीकामामुळे शरीरामध्ये कॅलरीज वाढतात. लठ्ठपणा, पोटाचा वाढलेला घेर, आदी गोष्टी मधुमेहाला कारणीभूत ठरतात. यासाठी साखर, रक्तदाब, कॅलसट्रोल हे तीन घटक शरीरांमध्ये प्रमाणित राखणे महत्त्वाचे आहे. निरोगी जीवन पद्धतीसाठी आहारात डाळी, उसळी, पालेभाज्या, फळे, दही, ताक यांचे सेवन करावे दररोज व्यायाम करावा.
प्रास्ताविकात सचिव अभिजीत रणवरे म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळाच्या ५५ शाखेतून ते ३३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून १३०० स्टाफ कार्यरत आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच कार्यरत असते. संस्थेचे मार्गदर्शक संचालक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील व विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतिपथावर आहे.
शकील मुलाणी यांनी संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले तर आभार अर्जुन बनसोडे यांनी मानले. प्रा. राजेंद्र धोत्रे लिखित विज्ञानाशी जडले नाते या पुस्तकाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.