अकलूज – भाजपाचे सरकार जेव्हापासून केंद्रात आले आहे तेव्हापासून ते पोत्याने योजना जनतेच्या माथ्यावर ओतत आहे. परंतु यातील किती योजना सुरू आहेत? किती आश्वासने सरकारने पाळली आहेत? हे निव्वळ बोलघेवडे सरकार आहे, आणि पंतप्रधान निव्वळ प्रसिध्दीला हपापलेले आहेत. या सरकारच्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) येत्या ४ ऑक्टोंबर ते १५ ऑक्टोंबर या काळात होऊ द्या चर्चा च्या माध्यमातून जनतेसमोर जाणार आणि त्यांना जागृत करणार असल्याची माहिती सेनेचे माढा लोकसभा निरीक्षक राहुल चव्हाण यांनी अकलूज येथे पत्रकार परिषदेत दिली.
चव्हाण म्हणाले, रात्रीस खेळ चाले असे भाजपाचे सरकार आहे. १५ लाख रूपये जनतेच्या खात्यावर टाकणार होते त्याचे काय झाले? उज्वला गॅस योजनेचे काय झाले? शिवछत्रपतींच्या स्मारकाचे काय झाले? मनीपुर अजुनही धुमसतेय, महागाई पराकोटीला पोहोचलीय, बेरोजगारी वाढलीय. आता तर हे सरकारी शाळा खाजगी संस्थांच्या ताब्यात द्यायला निघालेय. यांच्या सत्ता काळात एका बाजुला उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ होतेय आणि दुसऱ्या बाजुला रेशनला आधार जोड, पॅनला आधार जोड़, आधारला मोबाईल जोड या खेळामध्ये जनता मात्र नागवली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातला एक भुमिपुत्र यांच्या मंत्रीमंडळात आरोग्य विभागाचा मंत्री आहे. सध्या सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदार संघातील आरोग्य सेवा लाजिरवाण्या अवस्थेत पोहोचली आहे. दवाखाने आहेत तर डॉक्टर उपलब्ध नाहीत. जेथे डॉक्टर आहेत तेथे औषधे नाहीत. अनेक ठिकाणी ऑपरेशनची सोय नाही. या दवाखान्यांना निधी मात्र भक्कम मिळतो आहे. डॉक्टर नसतील, औषधे नसतील तर हा निधी जातोय कोठे? शिवसेनेची शिव आरोग्य सेना या सगळ्या गोष्टींचा जनतेसमोर पर्दाफाश करणार आहे. मतदार संघातील ३६४ गावांमध्ये कॉर्नर सभा घेणार आहोत. प्रत्येक महाविद्यालयात, आरोग्य केंद्रात, बाजाराच्या ठिकाणी जाऊन आम्ही लोकांना जागृत करणार आहोत. मतदार संघातील सुमारे १० हजार कुटूंबांपर्यंत शिवसेनेचे पत्रक पोहोचवणार असल्याचे राहुल चव्हाण पाटील यांनी सांगितले. दि 13 ऑकटोंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे .
यावेळी धनंजय डिकोळे, दिवाकर भटकंल, गणेश इंगळे,, स्वप्नील वाघमारे, अशोक घोंगडे, मधुकर देशमुख, राजाभाऊ गायकवाड, संतोष राऊत ,महादेव बंडगर ,भारत मोरे, सुभाष काकडे, सुभाष भोसले, अवधूत कुलकर्णी, शंकर मेटकरी, रणजित कदम,समाधान फडतरे, आकाश माने ,कुमार काका गव्हाणे,माणिक श्रीरामे, शंकर मेटकरी,दीपक सुर्वे , गोरख ताकमोगे, शंभूराजे फरतडे, जयदेव पवार, शंभू फुगे, उमेश काळे, आकाश माने,सौरभ चव्हाण, उमेश काळे, सागर साळुंखे इ. शिवसैनिक उपस्थित होते.